सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा; दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार सर्व दुकाने


सोलापूर – आजपासून सोलापुरातील पाच तालुक्यांना कोरोना निर्बंधातून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून या पाच तालुक्यातील कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधांमधून पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात सूट देण्यात आली आहे. या तालुक्यातील सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानेही सातही दिवस सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

आजपासून जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे संकट असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण प्रशासनाने आजपासून या संचारबंदीत शिथिलता दिल्याने दुपारी चारपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. प्रशासनाच्या या आदेशानुसार, आठवड्यातील पाच दिवस सर्व दुकाने सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवांची दुकाने संपूर्ण आठवडा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

निर्बंध उठवण्यात आलेल्या पाच तालुक्यांसाठी नियमावली

  • लग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
  • सर्व हॉटेल आणि रेस्टारंट 50 टक्के उपस्थितीत पाच दिवस सुरु ठेवता येणार
  • सर्व खाजगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली
  • सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना 50 टक्के उपस्थितीत परवानगी
  • प्रवासी वाहतूक आणि सलून स्पा आठवड्यांतील पाच दिवस परवानगी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सोलापुरातील पाच तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते.