आपले वजन नियंत्रणात राहावे यासाठी आजकाल आपण सर्वच जण प्रयत्नशील असतो. गेल्या काही वर्षांमध्ये एकंदर आरोग्याकडे आणि शारीरिक स्वास्थ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असून आताच्या काळामध्ये लोक आपल्या आहाराच्या आणि फिटनेसच्या बद्दल जास्त जागरूक असल्याचे पहावयास मिळत आहे. यासाठी अनेक निरनिराळे व्यायाम, निरनिराळ्या आहारपद्धती यांचा अवलंब केला जात असलेला पहावयास मिळतो. हे सर्व उपाय फायदेशीर ठरत असताना आणखी एक उपाय असा आहे जो अवलंबण्यास अतिशय सोपा आणि घराच्या घरी करता येण्यासारखा आहे.
शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. या पाण्याच्या सेवनाने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होत असून यामध्ये वापरले जाणारे साहित्य संपूर्णपणे नैसर्गिक असून याचे बहुधा कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. विशेषतः दंड, पोट, मांड्या इत्यादी ठिकाणी साठून राहिलेली चरबी कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला गेला आहे. त्याचबरोबर ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, त्यांच्यासाठी हे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवणारे आहे. या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, यामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्स अवयवांना किंवा टिश्यूंना अपाय करू शकत नाहीत.
या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती या पाण्याच्या सेवनामुळे उत्तम राहत असून, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘इन्फ्लेमेशन’ असल्यास ते दूर होते. या पाण्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असून यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. एखाद्याला खूप ताप येत असेल तर या पाण्याच्या सेवनाने ताप उतरण्यास मदत होते. या पाण्याच्या नियमित सेवनाने खाल्लेल्या अन्नातील पोषक द्रव्ये शरीरामध्ये अवशोषित होण्यास मदत होते. जर एखाद्याची भूक कमी झाली असेल, तर या पाण्याच्या नियमित सेवनाने भूक पूर्ववत होते आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी ही या पाण्याचे सेवन नियमित करावे.
हे पाणी तयार करण्यासाठी दीड इंच लांबीच्या ताज्या आल्याच्या पातळ चकत्या करून घ्याव्या. या पाण्याच्या चकत्या दीड लिटर पाण्यामध्ये घालून हे पाणी मंद आचेवर पंधरा मिनिटे उकळू द्यावे. त्यानंतर आच बंद करून पाणी थंड होऊ द्यावे. थंड पाणी गाळून घेऊन यामध्ये आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस घालून सकाळी एक ग्लास रिकाम्यापोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास असे हे पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे.
शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी उपयुक्त
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही