अंमली पदार्थ तस्करीवरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना भाजपने केले लक्ष्य


मुंबई – भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीवरून राज्य सरकारवर नायनाट बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम करण्यात आले. पण, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अंमली पदार्थांची तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले होते काय?, अशा कठोर शब्दांत अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्य सरकारला टीका केली आहे.

ठाकरे सरकार आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळंमुळं मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोपही यावेळी अतुल भातखळकर यांनी केला आहे. मुंबईसारख्या शहरात एवढी देशविघातक कृत्य होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. या विरोधात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.


मुंबईतील गुन्हेगारीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे, दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण, केवळ सुडाच्या राजकारणात राज्याचे गृहमंत्री हे मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला भातखळकर यांनी दिला आहे.

भातखळकर पुढे काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. पण दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते हे तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत आहे. जणू यामार्फत ते अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे दाखवून देत आहेत.