राज्यात लॉकडाऊन 4.0 ; 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊन सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली असून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत असणार आहे. दरम्यान आज म्हणजेच १७ मे रोजी लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत असून तत्पूर्वीच केंद्राने लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. पण त्याबद्दल अद्यापपर्यंत राज्य सरकारने कोणतीच घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवला जावा यावर एकमत झाले होते.

राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण याआधी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. याबाबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण केंद्राच्या नियमावलीची वाट पाहत असून त्यानंतर राज्याची नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे अशी सरकारची नागरिकांकडून अपेक्षा असणार आहे.

Leave a Comment