आजकाल तरुण वर्गातही पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याच्या वेदना, श्वास घेण्यास त्रास असे विकार वाढत चालले आहेत. सुखासीन जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही कारणे त्यामागे आहेत तसेच रोजच्या आयुष्यात वाढलेले ताणतणाव ही त्याला हातभार लावत आहेत. आपल्या वापरत असलेल्या मऊ मुलायम गाद्या हे विकार अधिक वाढवितात असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
मऊ गाद्या, उश्या सुखद वाटल्या तरी पाठीची दुखणी, स्वास्थ्यासाठी त्या चांगल्या नाहीत असे तज्ञ सांगतात. मणक्याचे विकार दूर ठेवायचे असतील तर जमिनीवर सतरंजी अथवा पातळ चटई टाकून त्यावर जमिनीला पाठ लावून झोपणे खूपच उपयुक्त ठरते. अश्या विश्रांतीचे अनेक फायदे होतात. पहिले म्हणजे जमिनीला पाठ लावून झोपण्याने पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो. उशी न घेता झोपले तर श्वास घेण्यास होत असलेला त्रास दूर होतो.
एखाद्या रात्री झोप येत नसेल तर अश्या प्रकारे जमिनीवर झोपून पहा, शांत झोप येते. खांदे, कुल्ले या ठिकाणी वेदना होत असतील तर जमिनीवर झोपण्याने त्या हळू हळू कमी होत जातात. पाठदुखीचा त्रास कमी होतो. गादीवर झोपल्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे शरीरात उष्णता वाढते. चटई अथवा सतरंजी घालून जमिनीवर झोपल्यास हा त्रास होत नाही शिवाय रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि मेंदू शांत राहतो. स्नायुंना आराम मिळतो. रोज जमिनीवर झोपणे शक्य नसेल तर जेव्हा जेव्हा पाठदुखी, कंबर दुखी व वरील कोणते त्रास होतात तेव्हा काही दिवस तरी जमिनीवर झोपावे असे सांगितले जाते.