यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिराळा येथे अतिवृष्टी आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप


अमरावती : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनामे, आवश्यक निधी प्राप्त होणे आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण होऊन मदतीचे वाटपही गतीने होत आहे. गतिमान व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिराळा येथे केले.

यंदा अतिवृष्टीमुळे घराची पडझड झालेल्या अमरावती तालुक्यातील ३१३ आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते शिराळा येथील सभागृहात करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभापती संगीता तायडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.आपद्ग्रस्तांच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

तहसीलदार काकडे म्हणाले की, अतिवृष्टीनंतर पालकमंत्री महोदयांनी स्वतः गावोगाव दौरा करून शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने तत्काळ मदतीचा निधी प्राप्त झाला व मदत वितरणाची कार्यवाही गतीने पूर्ण होत आहे. शिराळा येथील २२३, ब्राम्हणवाडा भगत येथील २४, फाझलापूर येथील ३, पुसदा २, देवरा १३, रोहणखेडा १६, वलगाव १०, नवे अकोला ३, कापूसतळणी २, ब्राम्हणवाडा गो. २, नांदुरा लष्करपूर ४, अंतोरा १२, सावंगा येथील १२ कुटुंबांचा त्यात समावेश आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाना साह्य योजनेत ४ कुटुंबातील सदस्यांना मदतीचे धनादेश यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

शिराळा येथील काँक्रिट नाली बांधकामाचे भूमीपूजन
शिराळा येथे ५० लक्ष रुपये निधीतून काँक्रिट नालीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.स्थानिकांची मागणी लक्षात घेता पालकमंत्र्यांनी निधी मंजुरीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घेतली. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे तायडे यांनी सांगितले.