शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – दत्तात्रय भरणे


मुंबई : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत व तलावात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. भरणे यांच्या हस्ते ‘ॲग्रोटेक’ मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी मासिकाचे संपादक गणेश हाके यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्यशासनाचे धोरण आहे, असे सांगून राज्यमंत्री भरणे म्हणाले, व्यक्तिगत, समूह पद्धतीने मस्त्यशेती करु इच्छिणारे शेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक यांच्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अनेक योजना आहेत. त्याशिवाय या योजनांमध्ये महिलांनाही प्राधान्य दिले जाते. पुढील काळात मत्स्यशेतीला प्राधान्य देण्यासह स्वतंत्र योजनाही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. तरी या योजनांचा लाभ घेऊन सर्व संबंधित घटकांनी प्रगती साधावी. मत्स्यव्यवसायासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान व अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाईल, असे भरणे यांनी यावेळी सांगितले.