समन्वय समितीचा ‘दहीहंडी साजरी करणारच’ म्हणणाऱ्या राम कदमांना टोला


मुंबई – सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारली आहे. दहीहंडी मंडळे, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत आज दुपारी घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. या बैठकीमध्ये समन्वय समितीने आपली बाजू मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच टास्क फोर्सने या आयोजनाचे काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितल्यानंतर समन्वय समितीला राज्य सरकारची भूमिका पटल्यामुळे त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.

पण भाजपचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ही बैठक सुरु असतानाच ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झाले, तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असे आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. समन्वय समितीला याचसंदर्भात बैठकीनंतर प्रश्न विचारण्यात आला. असता त्यांनी राम कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सन्मवय समितीची दुपारी बारा ते सव्वा दोनपर्यंत बैठक सुरु होती. राम कदम यांनी याच दरम्यान ट्विटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत काहीही झाले तरी दहीहंडी साजरी करणार असल्याची भूमिका घेतली. काही गोविंदा पथके महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा.


या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारने यावेळेची दहीहंडी कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नसल्याचे राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा उत्सव हिंदूंचा आहे. हिंदूंचे उत्सव जेव्हा येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले दिल जातात. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा? असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

बिअर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचे स्वागत करु, नियमांचे पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच, असे राम कदम म्हणाले आहेत.

समन्वय समितीने राम कदम यांच्या या विरोधी भूमिकेसंदर्भात बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना समितीच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही निर्णय घेतल्यानंतर काही लोक आंदोलन करतात, विरोधी भूमिका घेतात असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याचे नमूद केले. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना, असे या विरोध करणाऱ्यांना सांगितल्याचे स्पष्ट केले. राम कदम यांनाही मुख्यमंत्र्याचे हे वक्तव्य लागू होते, असे समन्वय समितीने म्हटले आहे.