मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर


मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण असलेला मोहरम उद्या 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रमजान ईद , बकरी ईद प्रमाणे सरकारने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण काल मुंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे. केवळ लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच ‘ताजिया’ मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण रस्त्यावरुन पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी असून, एका ट्रकवर केवळ 15 जणांनाच मुभा देण्यात आली आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना विहित करण्यात येत आहेत :

  • मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा. (कालच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास सर्शत परवानगी दिली आहे.)
  • सोसायटीतील नागरिकांनाही एकत्रित दुखवटा करू नये. वाझ/मजलीस ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत.
  • ताजिया/आलम काढू नये सबील/छबीलसाठी शासनाची परवानगी आवश्यक, बाटलीबंद पाणीच द्यावे लागणार.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  • तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे या नियमावलीत म्हटले आहे.