१९ जुलैपासून अकरावीच्या सीईटीसाठीच्या नोंदणीला सुरूवात


मुंबई – अंतर्गत मूल्यमापनाद्वारे राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ही परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने होणार असून, सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी १९ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. ही नोंदणी प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. या परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न या प्रवेश परिक्षेसाठी विचारले जातील. बहुपर्यायी प्रश्न १०० गुणांच्या या परिक्षेत विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये या परिक्षेतील गुणांच्या आधारावरच प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्यामुळे प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, पण प्रवेशाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे.