आजपासून राज्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरु; अशी आहे नियमावली


मुंबई : आजपासून राज्यातील कोरोनामुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरु होणार असून सरकारने शाळा सुरु करताना नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असणार आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन नियोजन करावे, असे आदेश शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शाळा सुरु करताना टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ विद्यार्थांना मिळावा यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोरोना निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. आजपासून राज्यात या सर्व नियमांचे पालन करत आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

आठवी ते बारावीचे वर्ग ज्या गावात सुरु करायचे आहेत. त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण नसावा. शिवाय, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत.

शाळा सुरु करत असताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशी सूचना दिल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, असे मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आजपासून देशभरातील इतर राज्यातही शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. त्यानुसार, काही निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. अशातच आजपासून शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच, अनेक राज्यांत शाळा, कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, चंदीगड, आंध्रप्रदेश या राज्यांत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.