कोल्हापुरातील दुकानांसंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय


कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कोरोना पॉझिटिव्हिटी दर जादा असल्यामुळे कायम ठेवण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. पण, आज तब्बल ९० दिवसांनंतर सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. शहरातील निर्बंध आठ दिवसांसाठी हटवण्यात आल्यामुळे नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

जैसे थे कोल्हापुरातील निर्बंध ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्बंध हटवण्याची मागणी केली होती. प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्यात वादही झाले होते. त्यानंतर प्रशासनाने मध्यमार्ग काढत आठ दिवसांसाठी निर्बंध उठवले आहेत. तसेच, आठ दिवसांनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम ठेवले होते. दुपारी चार वाजेपर्यंत केवळ जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. सोमवारी सकाळपासून दुकान उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला होता. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने यावर मध्यममार्ग काढला आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आले असून कोल्हापुरातील सर्व दुकाने आजपासून आठ दिवस उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.