कोरोनाकाळात पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक आधारासोबत भावनिक आधार गरजेचा – यशोमती ठाकूर


ठाणे :- ज्या बालकांचे पालक कोरोना काळात मयत झाले, अशा बालकांना सर्व प्रकारचे सहाय्य शासन करणार असून अशा बालकांना 5 लाखाची मदत शासन देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ‘मायेचा संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधला त्यानंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रत्येक बालकांना पुनर्रस्थापित करण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून बालकांना सहकार्य करण्यात येत आहे. बालकांचे शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे सर्वेक्षण चालू आहे. एकही बालक वंचित राहणार नाही. ज्या बालकांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र हरपले आहे अशा बालकांना आधार देण्याची आवश्यकता असून बालकांच्या विकासासाठी असलेला बालसंगोपनचा निधी देखील वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले

अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने पीडित बालकांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. बालकांना भावनिक आधाराची गरज असते त्यामुळे अशा बालकांना प्रथम भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत आई-वडील कोरोनाने मयत झाले आहेत अशा बालकांची संख्या 42 आहे. जिल्ह्यामध्ये अजून बालकांच्या तपासणीचे काम चालू असून पीडित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले यांनी सांगितले.