निवृत्ती समारंभात सरन्यायाधीशांकडून गुपित उघड; राममंदिर प्रकरणी शाहरुख खान करणार होता मध्यस्थी?


नवी दिल्ली : मागील कित्येक वर्षांपासून अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद सुरु होता. यावर अखेर गेल्यावर्षी तोडगा निघाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या निर्माणाचे भूमिपूजन झाले. पण शंकराचार्यांपासून ते श्री श्री रविशंकर यांच्यापर्यंत अनेकांनी हा वाद सुरु असताना मध्यस्थीचे प्रयत्न केले. पण अभिनेता शाहरुख खान राममंदिर प्रकरणी मध्यस्थी करणार होता, अशी माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या निवृत्ती समारंभाच्या वेळी आज हे गुपित उघड झाल्याची माहिती बार एसोसिएशन अध्यक्ष विकास सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, सरन्यायाधीश बोबडे हे राम मंदिर प्रकरणी मध्यस्थता करण्यासाठी शाहरुख खानचा समावेश करु इच्छित होते. मी त्यांच्या सांगण्यावरुन शाहरुख खानशी चर्चा देखील केली. तो देखील इच्छुक होता. पण मध्यस्थता पुढे जाऊ शकली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्च 2019 रोजी या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेत तीन सदस्यीय मध्यस्थता समितीची गठीत केली होती. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफुल्ला होते. तसेच या समितीतश्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने 2019च्या नोव्हेंबरमध्ये हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन त्या पक्षाला सोपवली, तर मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय देखील घेतला.

राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळा 5 ऑगस्ट 2020 रोजी केला गेला. कोरोनाचा काळ असल्याने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 175 जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.