कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले


मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता जून महिन्यात दहावीची परीक्षा आणि मे अखेरीस बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

याबाबत माहिती देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज शिक्षण विभागाची चर्चा झाली. अशावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली, ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने, जो निर्णय घेतला आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.