आंबेडकर जयंतींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना


मुंबई : येत्या 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमा होऊन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.
  • दर वर्षीप्रमाणे प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी.
  • सोशल डिस्टंन्सिंगच्या आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी.
  • चैत्यभुमी, दादर मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच दिक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींना परवानगी असेल.
  • चैत्यभुमी, दादर येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असणार आहेत.
  • शासनाकडून चैत्यभुमी, दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नागरिकांनी चैत्यभुमीवर न येता घरातूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.