शासनाच्या नियमावली नुसारच आंबेडकर जयंती साजरी करा – प्रकाश आंबेडकर


पुणे – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही याच कालावधीत असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

कोरोनाचे थैमान मागील वर्षीही सुरू होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आंबेडकरी जनतेचा त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यंदा पुन्हा आंबेडकर जयंती तोंडावर असतानाच राज्यात कोरोनाचे थैमान सुरू झाल्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.