
भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या अथवा महाराष्ट्रात मध्य प्रदेशमधून जाणाऱ्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या लालपरीवरील बंदी मध्यप्रदेश सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवली
महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूक या अगोदर २१ ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर भोपाळ, इंदौर, जबलपूर, बैतुल, छिंदवाडा, खरगोन आणि रतलाम येथील शाळा व महाविद्यालये १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील बस सेवेवरील बंदीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांनी नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी लॉकडाउनचा कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेले आहे.
