मुंबई – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत राज्यातील इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.
ऑफलाइनच होणार दहावी-बारावीच्या परीक्षा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री गायकवाड यांनी त्याला उत्तर देताना सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरवण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख, तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत.
गेल्या वर्षीचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे अडचणीचे गेले आहे. राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्चपासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचवली जाईल. अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक तयार केले आहे.