मुंबई – कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. फडणवीस यांनी यावेळी बोलताना शिवजयंती व धार्मिकस्थळांचा मुद्दा उपस्थित करत, महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले.
फडणवीस म्हणाले, या सरकारला असे वाटते की कोरोना कुठे वाढतो तर फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिरं यातूनच कोरोना वाढतो का? काहीतरी आकडेवारी द्यावी की कुठले मंदिर उघडल्याने कोरोना वाढला. केवळ मंदिरच नाही तर मी सर्व धार्मिक स्थळांचा विचार करतो. देशभरातील धार्मिकस्थळे उघडली कुठेही कोरोना वाढला नाही आणि महाराष्ट्रात कोरोना वाढला तर तो धार्मिकस्थळ उघडायला लावल्यामुळे वाढला?
Speaking on the discussion on Hon Governor’s address in Maharashtra Legislative Assembly#BudgetSession
https://t.co/aEOo4lveCu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2021
मला आश्चर्य वाटते पब, दारूची दुकाने चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, थिएटर चालू शकतात, राजकीय मेळावे देखील चालू शकता यामुळे कोरोना होत नाही? पण मंदिर व शिवजयंतीमधून कोरोना होतो? हे जे काय सुरू आहे ते चुकीचे असून महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही खूप मोठी परंपरा आहे. आज महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जशी संपूर्ण विश्वात ओळख आहे, तशीच वारकरी संप्रदायामुळे देखील आहे. पण त्याही संदर्भात या ठिकाणी वारंवार विषय उपस्थित करावा लागतो, हे खरोखर अत्यंत दुर्देवी आहे.
राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंतीवर निर्बंध आणली होती. त्यामुळे भाजपने या मुद्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले होते. तसेच, या अगोदर राज्यभरातील धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी देखील भाजपने आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली होती.