मुंबई – बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही शरजील उस्मानी असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उस्मानीला अटक करण्याची भाजपने मागणी केली. शरजीलच्या विधानाची राज्याच्या गृहविभागाकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.
पुण्यात ३० तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू. pic.twitter.com/sqZ66qDYFV
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 3, 2021
दरम्यान भाजप नेत्यांनी शरजील विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावरील उत्तरात शरजील सध्या महाराष्ट्रात नसल्याची माहिती दिली. ३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेत उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर आहे. पण तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
शरजील याने एल्गार परिषदेतील भाषणात आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपा नेते त्यानंतर आक्रमक झाले. शरजील याला तात्काळ अटक करा नाहीतर आंदोलन करू असा थेट इशाराच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला, तर नितेश राणे यांनी शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा, असा हल्लाबोल करत संताप व्यक्त केला होता.