भारताने नव्याने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनचा फुत्कार


नवी दिल्ली – भारताने अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनी ड्रॅगनची वळवळ पुन्हा सुरु झाली असून चीनने भारताकडून घेण्यात आलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या निर्णयाचा विरोध केला आहे. वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली भारत अ‍ॅप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवारी ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा त्यात समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारताच्या निर्णयाचा विरोध करताना चिनी प्रवक्त्या जी रोंग यांनी म्हटले आहे की, भारताकडून अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून याचा चीन विरोध करत आहे. आशा आहे की भारत सर्वांना आपल्या बाजारपेठेत निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसाय करु देईल आणि भेदभाव करणार नाही.

यावेळी भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप जी रोंग यांनी केला आहे. चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.