‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक


मुंबई – महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात चाचण्यांचे कमी केलेले दर, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय, मास्कच्या किंमतीवर नियंत्रण, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारख्या योजना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राबवल्या असून सामान्य माणसाला कोरोनाकाळात केंद्रस्थानी ठेवून जे नावीन्यपूर्ण निर्णय घेतले तो आदर्श इतर राज्यांसाठी उपयोगी असल्याचे म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारखे चांगले व अभिनव निर्णय घेतले असून महाराष्ट्राचे ते निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. राज्य सरकार दिवाळी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेत असलेल्या कोरोनाविषयक खबरदारीबाबत राजेश टोपे यावेळी माहिती दिली. राज्यातील अॅक्टीव्ह केसेस कमी झाल्या आहेत. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकर निदान लवकर उपचार यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.