
एखादा माणूस पाठदुखीने त्रस्त झाला की, त्याला डॉक्टर औषधे तरी देतात किंवा पूर्ण विश्रांतीचा सल्ला देतात. एखाद्या माणसाला अशा विश्रांतीमुळे आराम मिळतही असेल, परंतु तो सर्वांनाच मिळेल याची खात्री देता येत नाही. विशेषत: पाठदुखी कशाने निर्माण झाली आहे यावरही ते अवलंबून आहे. अचानकपणे ताण पडला असेल, नको एवढे वजन उचलले असेल आणि त्यामुळे पाठ दुखत असेल तर ती पाठदुखी विश्रांतीने आणि औषधाने कमी होऊ शकेल.
हालचाली करणे हाच पाठदुखीवरचा इलाज
असे असले तरी केवळ वय वाढल्यामुळे, वजन वाढल्यामुळे किंवा पर्याप्त हालचाली न केल्यामुळे पाठ दुखत असेल तर ती पाठदुखी विश्रांती आणि औषधाने कमी होणार नाही. त्यासाठी दिवसभरात थोड्याबहुत हालचाली करणे, थोडे चालणे, शरीराला ताण देणारे व्यायाम करणे यामुळे कमी होईल. तेव्हा पाठ दुखणार्यांनी औषधांच्या आहारी जाण्यापेक्षा थोडे मागे-पुढे झुकणे आणि शक्यतोवर लहान-मोठी कामे करीत घरात सक्रीय राहणे याबाबत कटाक्ष पाळावा.
अनेक लोकांना उगाच बसल्या जागीच पाठदुखी सुरू होते. खरे तर ती बसल्यामुळे सुरू झालेली असते. वयोमानानुसार जास्त हालचाली करणे योग्य नसले तरी वयाला झेपेल एवढ्या हालचाली केल्याच पाहिजेत. निव्वळ हालचाली थांबवणे आणि आराम खुर्चीवर बसणे योग्य नव्हे. बसून काम करावे लागत असले तरी अधूनमधून उठणे, आपल्या हाताने टेलिफोन उचलणे, पिण्याचे पाणी आपल्या हाताने घेणे, वाकून थोडा झाडू चालवणे अशा हालचाली कराव्या म्हणजे संभाव्य पाठदुखीपासून बचाव होईल.
