सध्या शरद पवारच राज्य चालवत असल्यामुळे राज ठाकरेंनी त्यांनाच भेटावे – चंद्रकांत पाटील


सांगली – आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. राज्यपालांनी राज ठाकरे यांना वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यावरून प्रश्न विचारण्यात आला असता प्रश्नाला उत्तर देताना नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांना पाटील यांनी टोला लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावरून भेट घेतली. राज्यपालांनी या भेटीत शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याचे माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनीच सांगितले. त्याचबरोबर गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेईल, असेही राज ठाकरे म्हणाले होते.

सांगली दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यपाल व राज ठाकरे यांच्या भेटीतील याच मुद्यावरून प्रश्न विचारण्यात आला. पाटील त्याला उत्तर देताना म्हणाले, राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. कोणत्या हेतूने त्यांनी म्हटले तेही माहिती नाही. पण मला विचाराल, तर आता शरद पवारच सध्या राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर शरद पवारांना भेटावे लागेल. कारण मुख्यमंत्री ना प्रवास करतात. ना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे लोकांचे म्हणणे ऐकतात.

महाराष्ट्रातील २५ मोठ्या मंदिरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मीटिंग घ्या. सहा सहा महिने मंदिर बंद असल्याने भक्तजी दक्षिणा टाकतात, ती बंद आहे. तरी देखील कर्मचाऱ्याचे पगार सुरू आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. अनेक मंदिर खूप सामाजिक कामे करतात. सध्याच्या घडीला त्यांची गंगाजळी संपत चाललेली आहे. हे समजून घ्यायला पण मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मग देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे लोकांना सहज उपलब्ध असल्यामुळे लोक असे म्हणतात की, त्यांनाच भेटून घ्या. मुख्यमंत्र्यांकडून गेल्या आठ नऊ महिन्यात माझ्या एकाही पत्राला उत्तर आलेले नाही. राज्यपालांनी काय म्हटले मला माहिती नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजींनी मी येथे बसतो, राज्य चालवण्याचे कंत्राट तुम्ही घ्या, असे केलेले दिसते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.