अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर


मुंबई – आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना १० हजार कोटींचे पॅकेजची घोषणा केली. सगळ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हेक्टरी २५ हजारांची मदत फळपीक नुकसानग्रस्तांसाठी केली जाणार. २ हजार ६३५ कोटींची तरतूद रस्ते आणि पुलांसाठी करण्यात आली आहे. १ हजार कोटींची तरतूद पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जिरायत आणि बागायत नुकसानग्रस्तांसाठी तरतूद करण्यात आली आहे. केंद्राकडे अद्याप राज्याच्या हक्काचे ३८ हजार कोटी प्रलंबित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून एकूण येणे ३८ हजार कोटी रुपये आहेत, पण ते अद्याप मिळालेले नाहीत. केंद्राचे पथक अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात पाहणीसाठी आलेले नाही. दोन तीनदा आम्ही विनंती केली आहे. १० हजार कोटी रुपये या आपत्तीत मदत देण्याचे निश्चित केले आहे. रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा यात समावेश आहे. ही मदत दिवाळीपर्यंत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपय प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी असल्यामुळे ती आम्ही प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बैठक झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, तर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब बैठकीस उपस्थित होते.