सुशांतच्या ‘सर्वोच्च’ निकालानंतर राज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज – फडणवीस


मुंबई – अनेक माध्यमातून सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरत असतानाच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्याचबरोबर सीबीआयला मुंबई पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करावे, अशा सूचना देखील न्यायालयाने केल्या आहेत. त्यानंतर यावरुन आता राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे म्हटले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, असे म्हटले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी केले आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला घेरण्यासाठी भाजपने ही रणनीती अवलंबल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश