सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला असून सर्वोच्च न्यायालयाने या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल दिला आहे. सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. मुंबई पोलिसांकडे पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचे सांगितले. निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.

१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्याने त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर रियावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. पाटणा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल केला. बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्येही संघर्षमय वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांची बाजू ऐकून सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.