४० टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले?


मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेला भारतीय जनता पक्षाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात करण्यात आलेले सेरो सर्वेक्षण आणि त्यातून समोर आलेले निष्कर्षावरून लक्ष्य केले आहे. मुंबईतील सुमारे ४० टक्के लोकांना कोरोना होऊन ते स्वबळावर बरे झाले असतील, तर यात राज्य सरकारने काय करून दाखवले, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी विचारला. सेरो सर्वेक्षणातून मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याचे समोर आले आहे. त्यावरून सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे.

१ लाखांच्या पुढे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. प्रशासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तीन प्रभागांमध्ये नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि महापालिकेने अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानुसार, झोपडपट्टीतील ५७ टक्के तर, इमारतींमधील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले. तर, एका खासगी लॅबच्या पाहणीनुसार आतापर्यंत २५ टक्के मुंबईकरांनी स्वबळावर कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीचा संदर्भ देत शेलारांनी राज्य सरकार आणि महापालिकेला लक्ष्य केले आहे. ४० टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर शेलार यांनी मुंबईत १ लाख अँटीबॉडी चाचणी करण्याची मागणी केली आहे. झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती, तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवले? १ लाख अँटीबॉडी चाचण्या करा… सत्य समोर येईल, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.