नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी


मुंबई : यंदा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेणे कोरोनाच्या या संकटकाळात शक्य नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने आणखी एक संधी दिली आहे. ७ ऑगस्ट, २०२० पर्यंत या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर, यंदाच्या दहावी व बारावीच्या वर्गात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.

यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण अकरावी व नववीचे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले. त्यातच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०१८ या शैक्षणिक वर्षाप्रमाणे होणारी फेरपरीक्षा ही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा निषेध करत विद्यार्थ्यांना सरसकट पास करून दहावी व बारावीच्या वर्गात पाठविण्याची विनंती अनेक पालकांसह शिक्षक संघटनांनी वारंवार केली.

नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत निर्णय घ्यावा, यासाठी ऑनलाइन काही पालकांनी आंदोलनही केले. त्यातच सरकार पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोबतच विद्यार्थी सुरक्षाही महत्त्वाची आहे. राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पुढील वर्गात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मग त्यात नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे, त्यांना वेगळा न्याय का? असे प्रश्न उपस्थित करत आंदोलनाचा पाठपुरावा केला होता.

सातत्याने शिक्षक संघटनांसह पालकांनी ही मागणी लावून धरल्यामुळे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाकडून ७ ऑगस्टपर्यंत शाळांना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया दराडे यांनी दिली.