एक शरद बाकी गारद नव्हे, तर एक नारद बाकी गारद : देवेंद्र फडणवीस


नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना विचारला आहे.

‘सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. कोरोनाबाबत एकही अग्रलेख ‘सामना’मध्ये नसल्याचे फडणवीस म्हणाले. यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. शरद पवारांच्या त्या मुलाखतीला संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असे म्हणत ‘सामना’ हे आता शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

राज्यात सध्याच्या घडीला मास टेस्टिंग अतिमहत्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी सरकार नंबर गेम खेळण्यात व्यस्त आहे. आकडे कमी दाखवण्यासाठी मुंबईकरांना सरकार अडचणीत आणत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अग्रेसिव्ह टेस्ट सरकारने मोफत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईचा इन्फेक्शन रेशो देशात सर्वाधिक आहे. खाजगी हॉस्पिटल सरकारच्या जीआरचा गैरफायदा घेत लूट करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment