या संकटकाळात सत्य आणि तथ्याच्या आधारावर पंतप्रधान मोदींनी देशाला विश्वास द्यावा


नवी दिल्ली – संपूर्ण देशात सध्या गलवाण खोऱ्यात घडलेल्या घटनेमुळे रोष व्याप्त आहे. दरम्यान काँग्रेस पक्ष संकटाच्या या काळात पूर्णपणे सरकारला सहकार्य करेल व साथ देईल, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सांगितले आहे. त्याचबरोबर चिनी सैनिकांबरोबर गलवाण खोऱ्यात लढताना शहीद झालेल्या भारताच्या २० वीर सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. आपण आणि सर्व काँग्रेस पक्ष या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.


चिनी सैन्य गेल्या दीड महिन्यापासून लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करत आहे. सध्या देशात प्रचंड आक्रोश असल्यामुळे पंतप्रधानांनी समोर येऊन देशातील जनतेला सत्य सांगितले पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भारतीय प्रदेशावर चिनी सैन्याने कसा ताबा मिळवला? भारतीय सैनिक का शहीद झाले?. सध्या तिथे काय परिस्थिती आहे? आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झाले आहेत? याची पंतप्रधानांनी संपूर्ण माहिती देशाला द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

भारताच्या कुठल्या भागावर चीनने ताबा मिळवला आहे. भारत सरकारचा या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विचार, धोरण, योजना काय आहे?, असे सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसपक्ष संकटकाळात सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. या संकटकाळात पंतप्रधान मोदींनी सत्य आणि तथ्याच्या आधारावर देशाला विश्वास द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.

Leave a Comment