मुंबई – सध्याच्या घडीला सोशल मीडियात मुंबई, पुण्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ही दोन्ही शहरे पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा असल्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आले आहे. तसेच असल्याप्रकारचे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया अॅडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘तो’ मेसेज खोटा
मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज/बातमी खोडसाळ; नागरिकांनी अशा खोट्या #Fake मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. खोटे संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा @MahaCyber1 चा इशाराhttps://t.co/nDGrRqvVyi pic.twitter.com/1KKY50NsC7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2020
मुंबई आणि पुणे ही दोन शहरे कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाउनमध्ये असणार, त्यासाठी नागरिकांनी सर्व जीवनावश्यक गोष्टींचा साठा करुन ठेवावा. ही दोन्ही शहरे आता लष्कराच्या ताब्यात देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाची सध्या एक बैठक सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, अशी खोटी माहिती या व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आली आहे.
पण, ही पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने टाकण्यात आली आहे, त्याचबरोबर तो सध्या प्रचंड व्हायरल झाला असून या खोट्या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसेच तो सोशल मीडियातून व्हायरलही करु नये, अन्यथा पोलिसांच्या सायबर सेलकडून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.