राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर : शरद पवार


मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. महाराष्ट्राला या कोरोनाच्या महामारीतून बाहेर कसे काढायचे, यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दिष्ट आहे आणि हीच भूमिका तिन्ही पक्षाची असल्याचे शरद पवार म्हणाले.

ते राज्यपालांच्या भेटीसंदर्भात म्हणाले की, राज्यपाल झाल्यापासून एकदाही भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो नव्हतो. त्यांनी मला दोन वेळा चहासाठी निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असे राज्यपाल म्हणाल्याचे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतो. नेहमी स्मारकवर भेटतो. काल मीच मातोश्रीला येतो, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच मातोश्रीवर गेलो होतो. यावेळी कोरोनाबाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाल्याचेही पवार म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्या असेही ते म्हणाले. सध्या राजकारणाचा विषय नाही. या काळात कोण राजकीय बोलणार? असेही शरद पवार म्हणाले.

Leave a Comment