राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने ओलांडला 50 हजारांचा टप्पा


मुंबई : राज्याभोवती जीवघेण्या कोरोना व्हायरसचा फार्स दिवसेंदिवस अजूनही घट्ट होत चालला आहे. कारण राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर काल एकाच दिवशी तीन हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत 3041 नव्या रुग्णांची भर पडली आहे आणि त्याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

काल दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1635 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 1196 कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात काल दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 39, पुण्यात 6, सोलापूर 6, औरंगाबाद शहरात 4, लातूरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 1 आणि ठाणे शहरात 1 मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. काल झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Leave a Comment