मुंबई – देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या राज्यांकडे माघारी जाण्यास सुरुवात केली आहे. मागील एका महिन्यापासून देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्गांवरुन अनेक मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या मूळ राज्यांकडे निघाल्याचे चित्र दिसत आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यामध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आलेला नाही असा टोला राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.
२५ मार्च पासून देशात सुरु असलेला लॉकडाउन ३१ मे पर्यंत कायम असणार आहे. पण लाखो स्थलांतरित मजूर या कालावधीमध्ये हाताला काही काम नसल्याने स्वत:च्या राज्यात परत निघाले आहेत. हातावर पोट असणारे अनेक मजूर आपल्या राज्यांमध्ये परत जात असताना महाराष्ट्रामध्ये एकही मराठी मजूर येत नसल्याचे निरीक्षण आव्हाड यांनी नोंदवले आहे. त्यांनी यासाठी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेल्यानेच हे चित्र दिसत असल्याचे म्हटले आहे.
पटले तर #RetweeetPlease pic.twitter.com/0ivFiM9n6B
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2020
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘पटले तर रिट्विट करा प्लिज’ या कॅफ्शनने एका पोस्टचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थानमधून मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आला नाही, एकही ट्रेन, एकही बस भरुन आली नाही? कारण यशवंतराव (चव्हाण), वसंतदादा (पाटील), सुधाकरराव (नाईक), शंकरराव (चव्हाण), शरदराव (शरद पवार), विलासराव (देशमुख) या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात घडलेला स्वयंपूर्ण आणि समृद्ध असलेला हा महाराष्ट्र (आहे), असा मजकूर या स्क्रीनशॉर्टमध्ये दिसत आहे. २० मे रोजी दुपारी दोन वाजता आव्हाड यांनी शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून २४ तासांच्या आत दोन हजार ७०० हून अधिक जणांनी ती रिट्विट केली आहे. तर ९ हजारहून अधिक जणांनी ती लाइक केली आहे.