भाजपच्या आरोपांची जयंत पाटलांकडून पोलखोल


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा जसाजसा वाढत आहे त्याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. कारण विरोधी पक्ष आता सत्ताधारी पक्षावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी केंद्राने 85 टक्के अनुदान देत असल्याचाही दावा करण्यात आला. तसेच राज्यपालाकंडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चकरा वाढल्या आहेत. त्यातच भर म्हणजे राज्यसभा खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. यावेळी भाजपने केलेले अनेक दावे आणि आरोप त्यांनी फेटाळून लावले.

आम्ही 85% सबसिडी देतो असा केंद्राचा दावा आहे. या आकड्यांनुसार सध्या तिकीट दर जास्त आहे. केंद्राच्या दाव्यात आणि तिकीट दरात फरक आहे. यावर आमच्या मित्रांनी बोलावे, श्रेय हवे असेल तर ती व्यवस्था चालू आहे का? हे पाहावे, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. रेल्वे तिकीटाचे 85 टक्के केंद्र सरकार खर्च करत आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आकडेवारी देत सडेतोड उत्तर दिले आहे.

पुढच्या 90 दिवसांसाठी मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड महापालिकेने ताब्यात घेतले आहेत. अशा रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठवण्याबाबत महापालिका केंद्रीय पद्धत राबवणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. उर्वरीत 20 टक्के बेड हे त्या रुग्णालयाकडे राहणार आहेत. गेले तीनचार दिवस मुंबईतील रुग्णांसाठी महापालिकेने एक डॅश बोर्ड तयार केला आहे. त्याच्या ट्रायल झाल्या आहेत. त्यानुसार लवकरच काम सुरू होणार आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड, किती आयसीयू बेड किती हे आता 1916 ला फोन केल्यावर कंट्रोल रुममधून कळणार आहे. तिथे 10 डॉक्टर असणार आहेत. रुग्ण आला की तो कुठे जाणार, बेड कुठे उपलब्ध आहे? याची सर्व माहिती फोनवर मिळणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये रुग्णालयात व्यवस्था आता यापुढे मिळणार आहे.

त्याचबरोबर जयंत पाटील यांनी यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढला तर 40 हजार पर्यंत रुग्णसंख्या जाण्याची भीती व्यक्त केली. याचदरम्यान डायलेलीस रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यासाठी डायलेलीस बेड पूल केले आहे. ही सुविधा त्यांना कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. मुंबई आयुक्त चांगले काम करत आहेत. त्याच्या कामावर शंका घेण्यापेक्षा पाठिंबा देणे अपेक्षित असल्याचा टोला पाटील यांनी विरोधकांना लावला. आतापर्यंत 4 लाख 26 हजार मजुर रेल्वेने राज्याबाहेर गेल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यातील 187 रेल्वे उत्तर प्रदेशमध्ये गेल्या आहेत. या आठवड्यात 200 रेल्वे गाड्यांचे नियोजन आहे. यातून 3 लाख लोक आपापल्या राज्यात जातील. आज 65 ट्रेन जाणार आहे. एका रेल्वेला 9-10 लाख खर्च येतो. आतापर्यंत 75 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्यात आले आहेत. यावरुन केंद्राशी वाद घालायचा नाही. भाजपने केलेल्या दाव्याची पोलखोल जयंत पाटील यांनी केली.

13 हजार 655 बसेस रस्त्यावर चालत जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना पाठवण्यात आल्या आहेत. खासगी 2 लाख वाहनांनी 8 लाख लोक बाहेर गेले. पश्चिम रेल्वेकडे देखील आम्ही मदत मागितली आहे, त्यानुसार पश्चिम रेल्वे आज 55 गाड्या सोडणार आहे. तर, 37 गाड्या गुजरातमधून सुटणार आहेत. यातील महाराष्ट्राला फक्त 18 गाड्या दिल्या आहेत. गरज असताना आपल्याला कमी ट्रेन मिळाल्या आहेत. त्यावरुन काही लोक चित्र तयार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काही करत नाही म्हणून आकडेवारी दिली.

20 लाख कोटीचे पॅकेज केंद्राने दिले आहे. या 20 लाख कोटीपैकी 2 लाख कोटी इतकी रक्कम बजेटमधून येत आहे. ही जीडीपीच्या एक टक्के रक्कम येत आहे. आमच्याकडून पॅकेज मागितले म्हणून खुलासा करत आहोत. राज्य सरकारचे केंद्राकडून येणारे पैसे आले तरी आभार मानू, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधी पक्षाला लगावला. आज पैशाची भ्रांत आहे. मुंबई, पुणे शहर ठप्प आहेत. केंद्र सरकारकडून 4050 कोटी राज्याला देण्यात येतात. त्यातील हक्काचे पैसे आले नाही. केंद्राने वेळेवर पैसे दिले पाहिजे. जीएसटी कॉम्पेनसेशन 5100 कोटी केंद्राने अजून दिले नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर शरद पवार साहेबांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत आमच्या मित्रांनी सल्ले देऊ नये, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपाल भेटीवरही जयंत पाटील यांनी सडकून टीका केली. हा काळ सर्वांनी एकत्रित येऊन लढायचा आहे. यात राजकारण आणू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. पण काही लोक या संकटकाळात देखील राजकारण करत आहे. तर, काही लोक अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे. आमच्याशी बोला, आम्हाला सुचवा, सतत राज्यपालांना जाऊन त्रास देऊ नका. व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. येथून पुढे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सल्ला द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

भाजपची सध्या महाराष्ट्र बचाओ ही आंदोलन करण्याची भूमिका आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांमध्ये त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहावे. हे भान सगळ्यांनी पाळवे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय प्लॅन आहे, हे सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटमधून कळेल. आम्ही काम करत आहोत, असे शेवटी जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment