उत्तर प्रदेश; घरी परतणाऱ्या मजुरांवर पुन्हा एकदा काळाचा घाला, भीषण अपघात 23 जण ठार


लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लॉकडाऊमुळे हातात काम नाही, तर खिशात पैसे नाही. त्यामुळेच विविध राज्यातील मजूरांनी आपल्या घरची वाट धरली आहे. हे मजूर आपआपल्या राज्यात परतण्यासाठी मिळेल त्या साधनाचा त्याचबरोबर वेळप्रसंगी पायी जाण्याचा पर्याय निवडत आहे. देशात सध्या सुरु असलेले स्थलांतर फाळणीनंतरचे सर्वात मोठं स्थलांतर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच मजुरांच्या या स्थलांतरादरम्यान, अनेक भीषण अपघात होत आहे. महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी मालगाडीच्या धडकेत मध्यप्रदेशातील मजुरांचा मृत्यू झाला होता.

आता उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला असून दोन ट्रक समोरासमोर आल्याने हा अपघात घडला आहे. दोन ट्रक एकमेकांसमोर येऊन धडक झाली. या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला आपल्या घरी जात होते.

दरम्यान, काल उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातही मजूर असलेल्या डीसीएम गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 14 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी मजूर मुंबईहून परत येत होते. डीसीएममध्ये एकूण 46 प्रवासी मजूर होते.

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, असुरक्षित पद्धतीने कोणत्याही प्रवासी मजुरांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ नये आणि आज हा अपघात घडला. आजपासून गाजियाबाद आणि नोएडामधून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी ट्रेनही चालवण्यात येणार आहेत. परंतु, तरी देखील मजूर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment