राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर तर, 1060 जणांचा मृत्यू


मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या तब्बल 1576 नवीन रुग्णांची काल राज्यात नोंद झाली असून त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29,100 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, मागील चोवीस तासात राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 34 जण मुंबई, तर पुण्यातील 6, अकोला शहरात 2, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1060 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 505 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 50 हजार 436 नमुन्यांपैकी 2 लाख 21 हजार 336 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 29,100 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 29 हजार 302 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 16 हजार 306 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यातील 6564 रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Comment