परिस्थिती पाहून 30 मे नंतर घेतला जाईल आषाढी वारीबद्दलचा निर्णय


पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रम, सोहळे, सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीची राज्यातील भाविकांना चिंता लागून राहिली आहे. आषाढी वारीवरही कोरोनाचे सावट पडलेले दिसून येत आहे. त्यातच विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकारी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या सदस्यांसोबतच्या बैठकीत कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वारकरी संप्रदायात आषाढी वारीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. पण राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता, पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळ्याचे स्वरूप कशा प्रकारे करावे, याबाबत राज्य शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच सरकार जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे सांगितले. पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली.

Leave a Comment