राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 1216 नव्या रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांचा आकडा 17,974


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काल तब्बल 1216 नवीन रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा असल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,974 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात काल 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 24 जण मुंबईचे तर पुण्यातील 7, वसई विरारमध्ये 7, सोलापूर शहरात 2, अकोला, पालघर आणि औरंगाबाद शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 694 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 207 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या 2 लाख 2 हजार 105 नमुन्यांपैकी 1 लाख 83 हजार 880 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर 17,974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 12 हजार 742 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 13 हजार 494 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3301 कोरोनाबाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरूष तर 19 महिला आहेत. त्यातील 25 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 14 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 43 रुग्णांपैकी 29 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment