कोरोनावरुन महाराष्ट्र-पंजाब सरकार आमनेसामने


नांदेड : देशभरातील अनेक राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय लोकांना आपल्या स्वगृही परतण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पंजाबमध्ये नांदेडहून काही भाविक परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर कोरोनाचा नांदेडमध्ये देखील आकडा अचानक वाढला आहे. नांदेडहून आलेल्या या भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोना पसरल्याचे पंजाब सरकारने म्हटले आहे तर पंजाबच्या चुकीमुळे नांदेडमध्ये कोरोना पसरला असल्याचा आरोप राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. आता यावरुन पंजाब आणि महाराष्ट्र सरकार आता आमने-सामने येऊन ठकले आहे.

पंजाबमध्ये नांदेडमधून गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अचानक नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर प्रशासनाने कालच सील केला आहे. पंजाबमध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे खळबळ उडाली आहे. नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पंजाबमध्ये कोरोना नांदेडहून आलेल्या भाविकांमुळे पसरल्याचे पंजाब सरकारने म्हटले आहे. पण आता काँग्रेस नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाबवरच नांदेडमध्ये कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे.

अशोक चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे की, नांदेडमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत एकही रुग्ण नव्हता पण काल हा आकडा अचानक 26 वर गेल्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. 26 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन रुग्ण वगळता बाकीचे 3 जण पंजाबहून आलेले आहेत, तर 20 जण गुरुद्वाराचे सेवेकरी आहेत. त्यामुळे या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून हे बाहेरुन आलेले लोक आहेत, हे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या गुरुद्वारामधील बाबांनी स्पष्ट केले आहे की, भाविकांची नियमित तपासणी केली जात होती. नांदेडमुळे या भाविकांना लागण झालेली नाही. या भाविकांना नांदेडमध्ये लागण झाली असती तर आम्ही तपासणी केली असती असे बाबांनी सांगितल्याचे देखील चव्हाण म्हणाले. पंजाबला गेलेले भाविक किंवा तिथून महाराष्ट्रात आलेले वाहनचालक यांना प्रवासात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या काल वाढून 26 झाली असली तरी नागरिकांनी भयभीत होऊ नये. परिस्थिती नियंत्रणात असून, सर्वांनी अधिक खबरदारी व सोशल डिस्टन्सिंग बाळगून शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Leave a Comment