बिहारची केंद्राकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बिहारी कामगारांसाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेल्या लॉकडाउननंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना आपआपल्या राज्यांमध्ये परत पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी वेगवेगळ्या राज्यातील सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केल्या आहेत. आज (१ मे २०२० रोजी) हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून तेलंगणा राज्याच्या मागणीच्या आधारावर झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली. आज २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे.

या वृत्तानंतरच केंद्राकडे बिहारमधील मंत्र्याने अशाच विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्राबरोबरच देशभरातील इतर राज्यामधून बिहारमध्ये सोडण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. बिहार सरकारने रेल्वे प्रशासनाकडे महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या बिहारच्या कामगारांना परत आणण्यासंदर्भात विशेष गाडी सोडण्याची मागणी केली आहे. बिहारमधील एका मंत्र्याने यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

देशामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्यानंतर तेलंगणा ते झारखंडदरम्यान आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावल्यानंतर बिहारमधील मंत्री संजय झा यांनी एएनआयशी बोलताना बिहार सरकारने अशाप्रकारची मागणी केल्याची माहिती दिली. दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. केंद्राकडे आम्ही विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली आहे. या लोकांना बसमधून आणण्याचा विचार केल्यास रेल्वेच्या केवळ एक तृतीयांश लोकांएवढीच बसची क्षमता असते. बिहारमधील लोक महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित परत आणणे महत्वाचे असल्याचे संजय झा यांनी म्हटले आहे.

मुंबईबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये अडकलेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी याआधीच महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना भाष्य केले होते. पण आता झारखंडसाठी तेलंगणामधून गाडी सोडल्यानंतर महाराष्ट्राबरोबर बिहार सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकार मुंबईत अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी विशेष गाडी सोडणार का हे आगामी काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Leave a Comment