१८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन : आरोग्यमंत्री


मुंबई: देशासह राज्यातील लॉकडाऊन येत्या ४ मे रोजी कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण कोरोनाग्रस्तांची मुंबई आणि पुण्यातील वाढती आकडेवारी पाहता या दोन्ही शहरातील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवल्यामुळे ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात मुंबई-पुणेकरांना थांबावे लागण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता एका वृत्तसंस्थेशी बोलताना वर्तवली. राज्यात लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लागू करण्यात आला आहे. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोनाच्या केसेस झोपडपट्ट्यांमध्ये झपाट्याने वाढत असून सध्या ही चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर मुंबई, पुण्यातील फक्त कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असेही ते म्हणाले.

सध्या राज्यात ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा गेल्या ७ एप्रिलपासून बंद आहेत. मुंबई-पुण्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावा लागेल. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात ३ मेनंतर कमीत कमी १५ दिवस कुठल्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment