
मुंबई : जीवघेण्या कोरोनासोबत लढाई करणाऱ्या महाराष्ट्रातील मृत्यूदर घटला असून गेल्या १५ दिवसांत महाराष्ट्राचा मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत ४.४० टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. तर ६.९० टक्के एवढा जागतिक मृत्यूदर आहे. त्याचबरोबर राज्यातील १४ हॉटस्पॉटमध्येही घट झाली आहे. राज्यात आता केवळ पाचच हॉटस्पॉट ठिकाणे असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत घटला
तत्पूर्वी राज्याचा मृत्यूदर जागतिक सरासरीच्या तुलनेत जास्त असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत होते. पण आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार ४.४० टक्के एवढा राज्याचा मृत्यूदर आहे तर जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के एवढा आहे. राज्यात कोरानाबाधितांचा आकडा ६४२७ एवढा झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ७७८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोनामुळे राज्यातील २८३ लोकांनी आपले जीव गमावले आहेत. तर ८४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
