उपमुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांकडे परप्रांतीय मजूरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी


मुंबई : पुढील महिन्याच्या तीन तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत संपत असून लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळे आणि त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, मुंबई व पुणे येथून रेल्वे मंत्रालयाने देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिले असून त्यांनी या पत्राद्वारे परप्रांतीय मजूरांच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की, दि.24 मार्चपासून केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहिर केल्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी राज्य शासनातर्फे शिबिर व्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील उद्योग, बांधकाम. सेवाक्षेत्र लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. ही मंडळी दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत. पहिल्या लॉकडाऊन समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करुन रेल्वे मंत्रालयाने केंद्र सरकारतर्फे लागू लॉकडाऊनची मुदत दि.3 मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरु होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल.

औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्याने, तसेच उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजूरांची येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने संख्या देशात सर्वाधिक आहे. असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर हे मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे ते दिड महिन्यांपासून शिबिरात आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. शिबिरांमध्ये निवास, भोजनाची, वैद्यकीय उपचारांची सोय राज्यशासन आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली आहे ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल. परंतू, जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत ते लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्रालयाने या शक्यता गृहित धरुन मुंबई व पुणे येथून, या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment