मुंबई आणि पुण्यात लागू असलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करा


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी पवार म्हणाले की, आपण सर्वांनी केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी घेतली तर आपण कोरोनावर मात करू शकू. लॉकडाउनचा कालावधी तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी नाईलाजास्तव ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. आपण या काळात काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यादरम्यान त्यांनी काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असे म्हणत मुंबई, पुण्यात लागू असलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे.

आजच्या घडीला अमेरिकेसारख्या देशातही मृत्यू झालेल्यांची संख्या ४० हजारांच्या वर आहे. ही संख्या स्पेनमध्येही २० हजारांवर तर फ्रान्समध्येही ही संख्या १९ हजारांच्या घरात आहे. काही देश पाहिले तर त्यांचा आकार महाराष्ट्राएवढा आहे. त्या ठिकाणची मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. पाश्चिमात्य देशांची आपल्याला तुलना करून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढणारा आकडा कसा थांबवायचा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील, असेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आपण हा आकडा शून्यावर आणणारच या आवाहनाला आपल्याला सामोरे जायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सुचना पाळल्या पाहिजेत. दोन लोकांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आपण कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. लोकांनी काळजी घेतली तर काही ठिकाणी यातून शिथिलता शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर लॉकडाउनमुळे मोठा परिणाम होत आहे. देश आणि राज्यातील आकडा चिंताजनक असून कोरोनाशी सामना करण्यासाठी जे लोक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आत्मियता दाखवणे आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण आहोत हे आपण त्यांना पटवून दिले पाहिजे. सर्वच यंत्रणा चांगले काम करत आहेत. पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका दिवसरात्र मेहनत करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालघर घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, जे काही पालघरला झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली. अशी प्रकरणे पुन्हा घडायला नको. ते निषेधार्हच आहे. पालघर प्रकरण आणि कोरोनाचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment