राज्यात काल दिवसभरात 118 नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा 3320 वर


मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग कमी झाला असून काल राज्यात 118 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. काल दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 3320 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या 74 हजार 587 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. काल राज्यात सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे पाच, पुण्यातील दोन जण आहेत. त्यापैकी पाच पुरुष तर दोन महिला आहेत. आज झालेल्या सात मृत्यूपैकी सहाजण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांपैकी सात रुग्णांमध्ये (71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.

Leave a Comment