शब्ब-ए-बारात तसेच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका


मुंबई – शब्ब-ए-बारात तसेच हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचे वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. शब्ब-ए-बारातसाठी मुस्लीम बांधवांनीही घराबाहेर पडू नये, घरातेच थांबावे असेही म्हटले आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचे आज प्रथम एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे, कोरोनाला प्रसाराची संधी न देणे आणि कोरोनाची साखळी तोडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही पुढील सूचना येईपर्यंत घरातच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

दररोज शेकड्यांनी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक असून परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांनी ओळखून वर्तन ठेवले पाहिजे. राज्यातील काही भाग शासनाने सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाईल. कोरोनाच्या संदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.

Leave a Comment