पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द; शिक्षण मंत्री


मुंबई : राज्य सरकारने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय घेतले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकाने आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असे जाहीर केल्यानंतर राज्याच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली. त्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा केली. पण नियोजित वेळापत्रकानुसारच दहावीची परीक्षा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज (20 मार्च) पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. दहावी वगळता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

याआधीच ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सरकारने आता पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment